इतिहास हा अजरामर आहे.....!!!!!

इतिहास हा अजरामर आहे.....!!!!!!!

एकीकडे जग अंतराळात गणित विज्ञानाच्या बळावर भराऱ्या मारत असताना दुसरीकडे आपल्या भारतात, महाराष्ट्रात मात्र इतिहास, भाषा, प्रांत यावरुन एकमेकांची डोकी फोडण्याच्या घटना घडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आणि वाईट आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज , लोकमान्य टिळक, महात्मा गांधी , पंडीत नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, सुखदेव, भगतसिंग अशी कितीतरी मंडळी हि आपली राष्ट्रीय ठेवा व प्रेरणास्थानं आहेत. या सर्व मंडळींनी देशहित व समाजहिताचा विचार करूनच कार्य केले आहे.  त्यांच्या वर प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. त्यांना जातीपातीची लेबलं लावणे हा करंटेपणा आहे. दुर्दैवाने सध्या ते वारंवार घडताना दिसत आहे.

आणखी महत्त्वाचा गंभीर मुद्दा म्हणजे आपल्या वर्तमान व भविष्याचा विचार न करता भुतकाळातील मुडदे उकरुन आपापसात वादविवाद व प्रसंगी मारामारी करण्याचे वाढते वेड हा होय. इतिहास हा फक्त वर्तमानात वावरताना चुका टाळणे व स्फुर्तीदायी घटनांपासुन प्रेरणा घेऊन भविष्य घडविण्यासाठी वापरायचा असतो.

पण आपण सगळेच त्या दृष्टिकोनातुन इतिहासाचा वापर करतो आहे का, यावर शांतपणे बसून विचार करण्याची वेळ आता आली आहे. घटनेने आपल्याला दिलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आपापसात आपले भारतीयत्व ठळक करण्यासाठी वापरण्याची आवश्यकता आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्वतःला ' मी सर्वात आधी आणि शेवटी भारतीय मानतो' असे विषद करतात. बाबासाहेबांचा हाच संदेश आपल्याला प्रत्येक मनापर्यंत पोहचवायचा आहे.


Comments